भोज्जा

गुरुवार, १२ जुलै, २०१८

मोरा गोरा अंग लै ले ! च्या निमित्ताने

१९६३ साली आलेल्या "बंदिनी" च्या  काही निवडक आठवणी आहे. त्यातील एक आठवण आमचे ज्येष्ठ स्नेही आणि विशेषत्वे संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या सोबत त्यांच्या म्युझिक क्रू मधे अकॉर्डिअन वादक म्हणून साथसंगत केलेल्या श्री.व्हिक्टर कडनार यांची आहे.श्री व्हिक्टर यांचे सध्याचे वय ८३ वर्षे आहे. 

ते आज आठवायचं कारण म्हणजे आज १२ जुलै ,बिमल रॉय या जुन्या जाणत्या दिग्दर्शकाचा जन्म स्मृतिदिन.अवघ्या ५६ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या बंगाली-हिंदी सिनेमा दिग्दर्शकाने वास्तववादी,सामाजिक आणि संवेदनक्षम चित्रपट बनवत हिंदी-बंगाली चित्रपट सृष्टीवर एक कायमचा ठसा उमटवून ठेवला आहे.दो बिघा जमीन,मधुमती,परख,सुजाता,बंदिनी हि त्यातील काही निवडक नावे.

१९६२-६३ साली बंदिनीच्या निर्मिती काळात व्हिक्टर सर काही एक कामानिमित्त बिमल रॉय यांच्या ऑफिसात गेले होते. बिमलदा बिझी असल्याने स्वाभाविकपणे  त्यांना वेटिंग रूम मध्ये बसावे लागले. तेवढ्यात बंदिनीचा सहनायक असलेला धर्मेंद्र हा सुद्धा तेथे त्याच्या काही एक कामा निमित्त आला. बंदिनीच्या निर्मिती काळात धर्मेंद्र हा चित्रपट सृष्टीत अतिशय नवखा होता..त्याचे अद्याप नाव झाले नव्हते ... त्याच्या ग्रामीण पार्श्वभूमी मुळे त्याला इंग्रजी बोलण्याचा सुद्धा सराव नव्हता.त्यामुळे आता या प्रसंगी त्या मोकळ्या वेळात व्हिक्टर यांच्या सोबत संवाद साधतांना त्याला अडचण येत होती.हि गोष्ट लक्षात येताच व्हिक्टर सर यांनी त्यास आप टेन्स मत होईये ,और फिक्र करना  छोड दीजिये , बिमल दा जैसे भारत के महान फिल्म डायरेक्टर ने आपको इस फिल्म के लिय सिलेक्ट किया है ये फिल्म के बाद आप का पूरे इंडस्ट्री में बडा नाम होगा इसका मुझे पूरा विश्वास है ,एक दिन आप हिंदी फिल्म इंडस्ट्रीमें बहोत नाम कमाओगे... आमच्या व्हिक्टर सरांचे  ते बोल धर्मेंद्रच्या बाबतीत पुढे जाऊन शंभरटक्के खरे ठरले...  

व्हिक्टर सरांनी मागे एकदा हा किस्सा आम्हांला जेव्हा सांगितला तेव्हा त्या नंतर उगाचच माझ्या डोळ्यापुढे तेव्हा  व्हिक्टर सरां कडे पाहून मनमोकळा ,निरागस हसणारा धर्मेंद्र डोळ्यासमोर येऊन गेला.. असो... 

बिमलदांचा दुसरा किस्सा सुद्धा या बंदिनीचाच आहे. बंदिनीच्या निर्मिती प्रक्रियेत कसे कोण जाणे पण संगीतकार एस डी बर्मन आणि गीतकार शैलेंद्र यांच्यात एक दिवस काही एक खटकले व शैलेंद्र फिल्म मधून बाजूला झाले.. पिक्चरचे एक महत्वाचे गाणे अद्याप लिहिणे बाकी होते... शैलेंद्र तर नाही मग आता काय करायचे ? मोठा प्रश्न आला. त्यांची जागा कोण घेणार ??? सरते शेवटी कुणा एकाने पाकिस्तानातून आपला मोटार मेकॅनिक हा पेशा सोडून हिंदी सिनेमात नशीब काढायला आलेल्या संपूर्णसिंग कालरा या २६-२७ वर्षाच्या तरुणाचे नाव बिमलदा आणि सचिनदा यांना सुचविले.बिमलदा सुरवातीला प्रथम तयार नव्हते पण   सचिनदांनी जरा जास्तच आग्रह केला म्हणून त्यांनी या तरुणाला ते  गाणे लिहायची संधी दिली... तब्बल ५ दिवस खपून त्याने ते तयार केले आणि या गाण्याच्या निमित्ताने हिंदी सिनेमाला ,आज त्यांना आपण ओळखत असलेल्या  "गुलज़ार " या नावाची आणि व्यक्तीची ओळख झाली... 

गीतकार गुलज़ार साहेबांचे ते डेब्यू गाणे आज या निमित्ताने...  
आजच्या लेखासाठी यु ट्यूब आणि इंटरनेट यांचे सहकार्य घेतले आहे...संबंधितांना मनःपूर्वक धन्यवाद.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा