भोज्जा

रविवार, ५ जून, २०११

६ जूनचे खरे महात्म्य

चिंतातूर जन्तूने मागच्या लेखात, मनात असलेली मळमळ थोडीफार बाहेर काढली.पण ह्या ६ जूनच्या महात्म्या बाबत थोडे खोलात जाऊन बघितल्या वर फक्त नि फक्त विषण्णताच पदरात पडली.म्हणजे "ह्याच साठी केला होता, काय तो अट्टाहास ?" हा प्रश्न मनात आल्या शिवाय राहिला नाही.कारण ज्या रायगडावर महाराजांना हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक झाला होता,तिथली सध्याची एकूणच अवस्था पहाता,पुढील तीनशे वर्षांनी तेथे  वास्तूरूपाने एकूणच काही इतिहास शिल्लक राहू शकेल काय ह्या बद्दल शंका आहे.आता अधिक उणे काही बोलत बसण्या पेक्षा प्रत्यक्षातच थोडे फार पाहूयात ...चला तर मग ... 
रायगडावर  श्री शिव छत्रपतींना  जेथे राज्याभिषेक झाला त्या जागेवरचे महाराजांचे राजबिंडे रूप डोळ्या पुढे उभे करणारे अप्रतिम शिल्प

हाच तो सध्याचा वादग्रस्त "वाघ्या"...ह्याच्या कानाच्या ठेवणी वरून  हा विदेशी जमाती मधील असल्याचे काहींचे म्हणणे आहे.  
अन हीच ती वादग्रस्त समाधी.वाघ्याने "अशा" प्रकारे उंची गाठल्याने वादाने सुद्धा त्या हून अधिक वरची उंची गाठायचा चंग बांधलाय.
अन ह्या  महादरवाजा कडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या,अन त्याची सध्याची अवस्था.
राजवाड्या कडे जायच्या मार्गा वरून गडाची दिसणारी अवस्था.
हे ढासळलेले  बुरुज अन त्याची झालेली "ही" सध्याची भग्नावस्था 
शत्रूच्या मार्गात खंबीर पणे उभी रहाणारी ही तटबंदी सध्या स्वतःच आधार शोधती आहे,झाडा झुडपांच्या सहाय्याने 
आणि ह्या उपर छत्रपतींच्या नावाने टिळा लावणाऱ्यांचे  वर हे आम्हालाच आज्ञापत्र.
आणि ६ जूनचा हा खरा इतिहास.येत्या ६ जून २०११ रोजी ह्या राज्याभिषेकाच्या सोहोळ्यास ३३७ वर्षे पूर्ण होत आहेत.
परवा सहजच म्हणून वाघ्याच्या मागे जायचा प्रयत्न केला अन योगायोगाने श्री.श्रीनिवास काळविट ह्यांच्या पिकासा अल्बम मध्ये जाऊन पोहोचलो.सदरहू तरुण हे गिर्यारोहणाचे प्रेमी दिसतात असे त्यांचा अल्बम पाहताना लक्षात आले.ह्या पोस्ट मधील रायगडावरील अतिशय सुस्पष्ट नि सुंदर फोटो त्यांनी गेल्या वर्षी २ ऑक्टोबर २०१० रोजी काढले असून,गतवर्षीच्या लांबलेल्या पावसाळ्या मुळे नि त्यांच्या फोटोग्राफितील कौशल्या मुळे काही अपवाद वगळता खरे तर त्यातील भग्नावस्थेस पोहोचलेल्या वास्तूरूप   इतिहासाकडे आपले लक्ष न जाता त्यातील निसर्गसंपन्नता आपले जास्त लक्ष वेधून घेते अन ह्यातच खरे तर शिवरायांच्या  नावाने मस्तकी टिळा ओढ्णार्यांचा पराभव आहे.इतिहासातील सत्य-असत्य हे जरूर शोधावे त्यास कुणाचीच हरकत नसेल पण त्या वर नुसताच घरात बसून खल केल्याने,नि पुतळ्यां मध्ये अडकून पडल्याने खऱ्या अथवा वास्तूरूप  इतिहासाचे कदापि रक्षण होणार नाही.त्या मुळे निदान ह्या पुढे तरी शिवरायांच्या वास्तूरूपाने थोड्याफार शिल्लक राहिलेल्या इतिहासाकडे तरी प्रशासन,जनता ,नि त्यांच्या नावाचा,कर्तुत्वाचा सार्थ अभिमान आहे असे म्हणणारे,सांगणारे नि नुसत्या "जय भवानी जय शिवाजी" ह्या बेंबीच्या देठापासून आरोळ्या ठोकणारे लक्ष देतील काय ? अन्यथा न जाणो, सध्याच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा घाट घालणाऱ्यांना अजून ३०० वर्षां नंतर,त्यांच्या म्हणण्या नुसार "ब्राह्मणीकाव्याने" इतिहासाचे लेखन करणाऱ्या  लेखनकर्त्यांचेच आभार मानायची वेळ येऊन ठेपेल ..कि निदान तुम्ही "इतिहास" हा वाड:मयरूपाने तरी लेखणीबद्ध केलात , जतन  केलात  म्हणून..  बघा बुवा...कारण ते बघायला निदान आम्ही तर नक्की नसू.... 

वरील पोस्ट मधील सर्व फोटोग्राफ्स हे श्री.श्रीनिवास (राहुल) काळविट  ह्यांच्या  https://picasaweb.google.com/Rahul.Kalvit/Raigad# ह्या ठिकाणाहून घेतले असून फक्त आज्ञापत्राचा फोटो हा सिंहगडावरील अल्बम मधील आहे.सदरहू फोटोग्राफ्स उपलब्ध करून दिल्या बद्दल श्री.काळविट साहेब ह्यांचे मनोमन आभार नि धन्यवाद.                    

1 टिप्पणी:

  1. दैनंदिन व्यवहारात हा प्रसंग आपल्याला बिलकुल नवीन नाहीये कि दोन अनोळखी व्यक्तींचे, रस्त्यात काही एक कारणा वरून जर भांडण झाले नि ..ते प्रथम सुरु करणाऱ्याने ते भांडण, जर अचानक मारामारी पर्यंत नेले, नि नंतर समोरच्याची ताकद जास्त आहे हे जर त्याच्या लक्षात आले,तर त्याची पंचाईत होऊन बसते.अशा वेळी जर कोणी त्या दोघा मध्ये पडून, म्हणजेच मध्यस्थी करून ते भांडण सोडवू लागला तर, ते भांडण प्रथम सुरु करणाऱ्याला मनातल्या मनात थोडे हायसे वाटते,पण पडलो तरी नाक वर ह्या म्हणी प्रमाणे ,तो उगीचच,उसने अवसान आणून .."सोडा मला ,सोडा मला बघतोच साल्याकडे,"असे जमलेल्या गर्दी समोर तोंडदेखले म्हणत रहातो ,.....पण कधी ?..... तर जेव्हा "सोडा मला, सोडा मला" म्हटल्यावर तो भांडण सोडवणारा त्याला सोडणार नाही ह्याची पूर्ण खात्री पटल्यावर.(खरे तर जमलेल्या त्रयस्थ नि तटस्थ गर्दीला त्या भांडणात नक्की कोणाची बाजू वरचढ होती हे उमगलेले असते पण ते हि, जाऊ द्याना आपल्याला काय करायचे,,,मिटले न ? मग झाले तर ....असा विचार करून मार्गस्थ होतात.
    वाघ्या विषयीच्या ६ जूनच्या नियोजित आंदोलनात,आंदोलनकर्त्यांची काहीशी हीच अवस्था झाली होती.पण मा. मुख्यमंत्री भांडणात मध्ये आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले असे नुकतेच समजले. :) थोडक्यात आपण आता मार्गस्थ व्हायला मोकळे :)

    उत्तर द्याहटवा