भोज्जा

बुधवार, २७ जून, २०१८

हरवत गेलेला "पंचम" ... २७ जून


एके दिवशी दुपारच्या वेळी किशोरकुमारच्या घरचा फोन वाजला तो नेमका किशोरदांनीच  घेतला.पलीकडून आवाज आला ,
"दादा, पंचम बोल रहा हूँ! अमित हैं ?

झोपलाय तो  !  किशोरदांनी त्याला सांगितले.  यावर आश्चर्यचकित होत आरडी म्हणाला , आत्ता दुपारी ?  या वेळी झोपलाय ? त्यावर किशोरदा म्हणाले  कां ? काही स्पेशल ? त्यावर आरडी म्हणाला, हां ! उससे एक गाना गवाना था मुझे ! त्यावर  थोड्या मस्करीत किशोरदा त्याला म्हणाले "यार गाना ही गवाना है तो उसे भूल जा ! मैं आता हूं उधर ! ". पण आरडी सुद्धा कमी नव्हता तो म्हणाला "नको तू आता ५०+ आहेस , तुझा आवाज येथे फिट्ट बसत नाहीये ... हसत हसत किशोरदांनी आरडीचा फोन अमितच्या रूममध्ये ट्रान्स्फर केला.अमितने तो उचलला नि पलीकडून आरडी जवळ जवळ त्याच्यावर जणू खेकसलाच ,
YOU idiot, you are sleeping in the afternoon??? Come fast...
तुला आत्ता आशा बरोबर एक गाणे गायचे आहे.तासाभरात स्टुडिओत हजर हो ...

हे साल होते १९८५ किंवा १९८६ची सुरवात.. संगीतकार म्हणून आरडी बर्मनचा डाऊन फॉल होत गेलेला कालावधी... पण त्याला कारण पण तसेच होते...
हिंदी चित्रपट सृष्टीचा १९५० नंतरचा बॅडपॅच असलेलं दशक कोणते तर निर्विवादपणे १९८० ते ९० चे दशक म्हणून सांगता येईल.कारण सलग दोन दशके सिनेमात काम करत म्हातारे झालेले किंवा होत गेलेले सिनेमांचे हिरो आणि हिरॉईन्स (सध्या पण तीच अवस्था आहे म्हणा ) पाहून-पाहून लोक कंटाळले होते. त्यांना रिप्लेस केलेल्या फ्रेश चेहर्‍याच्या, पण नायकांच्या मुलांना त्यांच्या सुरवातीच्या एखाद दुसऱ्या सिनेमाव्यतिरिक्त जनतेने नाकारले होते. नावीन्य हरवले होते. निर्माते दिग्दर्शक ऍक्शन,तद्दन गल्लाभरू टुकार सिनेमांच्या मानसिक गुलामगिरीतून अद्याप बाहेर पडले नव्हते. व्हिडिओ पायरसिने चित्रपट सृष्टीचे कंबरडे मोडले होते आणि त्यात भर म्हणून , टीव्ही मीडियाने हिंदी चित्रपटाच्या  हक्काच्या प्रेक्षकांवर डल्ला मारला होता.  त्यामुळे नावीन्या विना प्रेक्षक वर्ग पुन्हा वळणार नाही व नवीन चेहरे घेतल्याने सर्व दृष्टीनेच स्वस्तात सिनेमा बनवता येऊन रिस्क फॅक्टर कमी होतोय हे ओळखून हिन्दी सिनेमात सगळीकडेच रिप्लेसमेंटचे वारे वाहू लागले ... पण याचा सर्वाधिक फटका बसला तो सर्वकालीन ग्रेट म्हणून आज २०१८ मध्ये सुद्धा सगळ्यांच्या आठवणीत असलेल्या आर डी बर्मनला..
कारण आरडी तेव्हा काही म्हातारा झाला नव्हता..तो तेव्हा हार्डली ४५-४६ चा होता ...आणि त्याचं संगीत तर अजून तरुणच होतं  ...  संगीतकार म्हणून त्याचे पोटेन्शियल अजूनही निर्वीवादच होते पण एकेकाळी  आपला डावा पाय सीटवर दुमडून कारने खंडाळ्याला आशा सोबत लॉन्ग ड्राईव्हला जाताना,डाव्याहातात सिगारेट पेटवून तिचे झुरके मारत उजव्या हाताने गाडीच्या टपावर ठेका धरत अगदी सहजपणे "खेल खेलमें " मधलं "खुल्लम खुलला प्यार करेंगे" चे कॉम्पोझिशन करणारा आरडी ,संगीतकार म्हणून अजून तितकाच ताजा असूनही सिनेमा निर्माते-दिग्दर्शक ,फायनान्सर ते समजण्याच्या योग्यतेचे नव्हते.कारण १९४२ लव्ह स्टोरी च्या म्युझिक साठी तर केवळ विधूविनोद चोप्रा हाटून बसला म्हणून त्याचं संगीत १९९४ ला आपण ऐकू शकलो... अन्यथा १९४२ लव्हस्टोरीच्या एंटायर म्युझिकसाठी अवघे २ लाख रुपये मोबदला द्यायला सुद्धा निर्माते तयार नव्हते…. असो.... काळाचा महिमा ... दुसरं काय म्हणायचं याला ... पण खरं बोलायचं तर आरडीचा शेवटचा आधार किशोरकुमार जेव्हा १९८७ ला अचानक तडकाफडकी गेला तेव्हाच आरडीच्या संगीतावर मर्यादा आल्या ही वास्तवता होती... फिमेल व्हॉईसला त्याचे वैवाहिक संबंध ताणले गेलेलं असून सुद्धा निदान "आशा" होती ... पण मेल व्हॉइसचं काय ? पण १९४२ ला नेमका सिनेरसिकांचं नशीब म्हणून किशोरला बऱ्याचअंशी रिप्लेस करणारा कुमार शानू मिळाला नि त्यानं संधीचं सोनं केलं ..

आरडीचे आजचे गाणे श्रवणीय तर नक्कीच आहे पण हा जीवा नावाचा सिनेमा कधी बनला ,कधी आला नि कधी गेला ते त्यातील नायक नायिका सुद्धा आज सांगू शकणार नाहीत...त्यामुळे त्यातील आजच्या गाण्याच्या पहिल्या अंतर्‍यातील गुलज़ारचे खालील काव्य शब्दशः वेस्ट गेले.  

जब से तुम्हारे,  नाम की मिस्री  होठ लगायी है...
 मीठा सा ग़म, है और मीठी,  सी तनहाई SS...  है...
रोज़  रोज़ आँखों तले .

असो ... कालाय तस्मै नमः ! म्हणू नि गाणे पाहून पेक्षा  ऐकून पुढे जाऊ ... आरडी बर्मनच्या आज २७ जून रोजीच्या ७९ व्या स्मृतिदिनी , ही गान भावांजली आपण सादर अर्पण करूयात   .. 
RD ,we miss you a lot ....
आजच्या लेखासाठी इंटरनेटचे सहकार्य घेण्यात आले आहे... संबंधितांचे मनःपूर्वक आभार...    




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा