भोज्जा

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

"कोलावेरी डी"!अर्थात "समर्था घरचे श्वान'

एव्हाना कोलावेरी डी चे तोंड फाटे पर्यंत कौतुक करून झाले आहे,तरुण पिढीला त्याने घातलेली भुरळ पाहता तरुणांच्या ह्या आवडी पेक्षा त्यांची खरोखरच्या श्रवणीय संगीताच्या बाबतीत सध्या होत असलेली उपासमार प्रकर्षाने नजरे समोर येते.सध्याच्या संगीतकारांच्या सिनेमातील गाण्याला दिलेल्या अति सुमार चाली पहाता,सगळ्याच वाईट गाण्यात  त्यातल्या त्यात बरे काय तर कोलावेरी डी ...आणि  म्हणून  तर खरे,ते जास्त उचलले गेले असावे अस उगीच राहून राहून वाटत.


मालगाडी यार्डात किंवा प्लॅटफॉर्मवर लागताना तिच्या चाकांमुळे जो ठेका तयार होतो ,तो ठेका म्हणजे ह्या गाण्याचा प्राण,हा ठेका लयबद्ध नि थोडाफार गुंगवून टाकणारा असतो हे नव्याने सांगायला नको.. गाण्याचे शब्द धनुष म्हणतो त्या प्रमाणे यथातथाच आहे ….थोडक्यात काय तर करायला गेला मारुती नि झाला गणपती अशी एकूण अवस्था.पण असो... निदान गणपती तर झाला...पण राहून राहून अस वाटत कि ह्यात रजनीकांतचा सुद्धा हात असावा :) ..... खास करून त्याचा तमिळ सिनेमा इंडस्ट्रीवर  असणारा वट पहाता,ह्या तशा सुमार गाण्या बद्दल  त्याच्या मुलीला नि जावयाला  "बाबा रे गाणे तसे ठीक आहे,पण एवढे डोक्यावर घेऊन नाचण्या सारखे त्यात काही नाहीये रे ?" हे सांगायला कदाचित कुणी  धजावले नसेल अशी  एक डोक्यात उगीचच शंका येऊन जाते.,आणि त्या मुळेच केवळ "समर्था घराचे श्वान" ह्या न्यायाने त्यालाही गंध,फुल अन अक्षता वहिल्या जात आहेत अशी आमची एक पुणेरी कुजकट शंका.. कारण म्हणतात ना कि "मोठ्यांच सगळंच  मोठ "  :) हा त्यातलाच एक प्रकार तर नव्हे ? कारण प्रत्येक सर्वसामान्य हा तानसेन होऊ शकत नाही हे नक्की,पण म्हणून कानसेन व्हायचा त्याचा अधिकार मात्र कुणी हिरावत नाही..

   


५ टिप्पण्या:

  1. अनामित१२:३९ PM IST

    खरे आहे. कोलवेरी दी मध्ये कौतुक करण्यासारखे काहीच नाही. एक सामान्य गाणे, सामान्य चाल असलेले गाणे आहे ते.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रती अनामित,
    खरे तर समर्था घरच्या श्वाना ऐवजी मला आधी "बालकवी" आठवले होते.पण त्यांचे नाव ह्या पोस्ट मध्ये घेणे हा सुद्धा एक अपराध ठरेल असे मी स्वतःच ठरविल्याने समर्था घरच्या श्वानाला "कोलावेरी दि" वर सोडले:)म्हटले नाही तरी ते सुद्धा बरेच दिवस झाले नुसते दत्तगुरूंच्या पायाशीच बसून आहे तर आता होऊन जाऊ द्यात ...त्याला काही तरी काम द्यावे:)
    लहानपणी शाळेत असताना मराठीच्या पाठ्यपुस्तकात बालकवींच्या कविता असत,त्या वर "बालकवींच्या अमुक एका कवितेचे रसग्रहण करा"असा पेपरात एक प्रश्न यायचा.खरे तर बालकवींनी ते काव्य कोणत्या मूड मध्ये,नि कसे केले असेल,त्यांना त्यातून नक्की काय अर्थ अभिप्रेत असेल,सांगायचा असेल,हे खरे तर त्यांचे त्यांनाच ठाऊक असेल,असे आम्हाला राहून राहून वाटायचे पण शिक्षकांनी सांगितलेले /लिहून दिलेले, त्याचे रसग्रहण "ह्यातून कवीचा जीवना विषयीचा गूढ दृष्टीकोन,मनस्वी उदासीनता,ओतप्रत आनंद "वगैरे वगैरे ह्या सारखे शब्द प्रयोग वाचून ते लक्षात ठेवायला इतकी पंचाईत व्हायची,कि परीक्षेच्या वेळेला "च्यायला ह्या बालकवींना दुसरा काय उद्योग नव्हता काय अशा कविता लिहिण्या पेक्षा ?" असे खुपदा मनात यायचे,आणि वाटायचे कि मुलांनी त्यांच्या कवितेचे जे पोस्टमार्टेम उर्फ रसग्रहण केले आहे ते जर बालकवींना त्या वेळीच वाचायला मिळाले असते तर तर त्यांनी कविताच काय पण नुसते कागदावर लिखाण करणे सुद्धा जागेवरच थांबवले असते.
    ह्या गाण्याच्या बाबतीत सुद्धा तसेच आहे.त्याच्या विषयीचे एकेक नमुने वाचले कि चकित व्हायला होते,नि आश्चर्याने थक्क होऊन तोंडात फक्त हाताची नाही तर पायाची बोटे सुद्धा घातली जातात,कि अरे ! हे नव्हत आपल्याला माहिती ? त्या धनुषची अवस्था सुद्धा ह्या पेक्षा काही फार वेगळी नसेल ! नाही का?
    आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  3. प्रती अनामित,
    कोलावेरीचा व त्या गाण्यातील काही शब्दांचा अर्थ खालील प्रमाणे.
    कोलावेरी : विश्वासघात, जीवघेणा
    सूप साँग : प्रेमभंगाचं गीत
    सूप बॉईज : प्रेमभंग झालेले तरूण
    शो मी बोवू यू.. : प्रेमात नाकारलेला

    सौजन्य श्री मेघराज पाटील ह्यांचा ब्लॉग.धन्यवाद पाटील साहेब.
    अधिक उत्सुकता असेल तर हे संपूर्ण गाणे कृपया येथे वाचा.
    http://meghraajpatil.wordpress.com/

    उत्तर द्याहटवा
  4. प्रिय Mynac जी, आपला आता ब-यापैकी परिचय झाला आहे, म्हणून सांगतो- Mynacजी हे असे संबोधायला मला थोडे ऑकवर्ड वाटते. खरे नांव काय असेल बरे? असेही वाटून जाते. असो. शेअरबाजारापेक्षाही जुनी माझी आवड संगीत हीच आहे. थोडीफार गतीही आहे त्यात.मलाही नव्या पिढीकडून लो-ग्रेड संगीताचे उगीच कौतुक झालेले पटत नाही-रागही येतो.हे म्हातारपणाचं लक्षण आहे असे मात्र मला वाटत नाही. हे जे डीग्रेडेशन आहे ते कालसापेक्ष वा व्यक्तीसापेक्ष नाही तर ऍबसोल्युट डीग्रेडेशन आहे.क्रिकेटही माझा जीव कि प्राण होता पण त्याचेही धंदेवाईक स्वरूप आणि मुख्य म्हणजे लोक त्याला सतत फसतात ते बघवत नाही.खाली २ लिंक देतोय-मला या दोन्ही बाबतीत काय वाटते ते मी व्यक्त करायचा प्रयत्न केलाय.फारसा कुणाला तो आवडलेला दिसत नाही.तुम्ही समजू शकाल असे वाटतेय.म्हणून इथे देतोय.जरूर वाचा.माझ्या ब्लॉगवर इतर ब्लॉगच्या लिंक्स अजून दिल्या नव्हत्या. तुमच्या ब्लॉगपासून सुरु करतोय.
    http://alibagwala.blogspot.com/2009/11/blog-post_23.html
    http://alibagwala.blogspot.com/2009/02/blog-post_27.html

    उत्तर द्याहटवा