भोज्जा

शनिवार, २१ एप्रिल, २०१८

उत्तर हे नेहमी तुमच्या पाशीच असते...


एकदा एका राजाला राज्यकारभारात ३ महत्वाचे प्रश्न पडले की, कोणतेही कार्य सुरू करण्या अगोदर १) त्याची नेमकी वेळ कशी ओळखावी ? २)  ते  पार पाडण्यासाठी कोणती योग्य  माणसे नेमावीत आणि कोणती टाळावीत ?आणि सर्वात महत्वाचे म्हणजे   ३) ते अयशस्वी होऊ नये या साठी त्या-त्या  वेळी नेमके कशाला महत्व द्यावे ? ...या प्रश्नांवर  त्याने खूप विचार केला ,पण त्याला समाधानकारक उत्तर मात्र मिळाले नाही त्या मुळे शेवटी त्याने त्याच्या सल्लागारांना बोलावून घेतले.

सल्लागारांनी त्यांची आपापली मते सांगितली,पण राजाचे मात्र काही समाधान झाले नाही. शेवटी निराश होत राजाने मनाशी काही एक ठरवले नि एके दिवशी सकाळी-सकाळी काही मोजकी माणसे घेऊन तो दूरवर एका जंगलात गेला ... जंगलात आतवर गेल्यावर त्याने आपली ओळख पटू नये या साठी राजवस्त्रे उतरवून अतिशय साधा वेश परिधान केला, आणि  सोबतच्या सैनिकांना तेथेच थांबायला सांगून तो ,त्या जंगलात रहाणार्‍या एका कृश शरीरयष्टीच्या ज्येष्ठ साधू पुरुषा समोर उभा येऊन ठाकला.

राजा जेव्हा त्याच्या पाशी गेला तेव्हा ,तो साधूपुरुष त्याच्या हातात असलेल्या एका छोट्याशा कुदळीने ,त्याच्या झोपडी शेजारील जमीन उकरत होता...

राजाने त्याला प्रणाम करत त्याला पडलेले ते 3 प्रश्न  आता त्या साधू पुरुषाला विचारले आणि तो त्याच्या उत्तराची वाट पाहू लागला.. पण साधू पुरुषाने त्या कडे दुर्लक्ष करत आपल्या हातातील काम सुरूच ठेवले...पण थोड्याच वेळात  तो खूपच दमला आणि जमिनीत गेलेले कुदळ त्याला बाहेर काढता येईना.... हे बघून राजाने पटकन पुढे होत त्याला मदत करायच्या दृष्टीने साधू पुरुषाला  बाजूला व्हायची विनंती करत त्याच्या हातातील कुदळाचा ताबा घेत जमीन उकरायला सुरुवात केली... की, जेणे करून  काम झटपट संपेल व साधू त्याच्या प्रश्नांची उत्तरे त्याला देऊन मोकळा करेल... पण राजा स्वतः पुढे होऊन स्वइच्छेने मदत करतोय म्हणल्यावर काम वाढू लागले... 
बघता-बघता दुपार झाली ... अंगमेहनतीच्या कामाची सवय नसल्याने राजा सुद्धा दमला हे बघून साधू उठला.  त्याने झोपडीत जाऊन कंदमुळे आणि काही फळे आणली आणि ती राजासोबत बसून खात दोघांनी भूक भागवली... वर पाणी पिऊन झाल्यावर क्षणभर थांबत राजाने पुन्हा पहिले राहिलेले काम पूर्ण करायला  घेतले ...आणि  बघता –बघता उन्हं कलली आणि संध्याकाळची चाहूल लागली ... सरते शेवटी राजाच्या हातातील त्याचे काम संपले... 

आता आपल्याला आपल्या त्या सकाळच्या 3 प्रश्नांची उत्तरे हा साधू देईल या अपेक्षेने राजा आता  त्या  साधू पुरुषा सोबत  त्याच्या झोपडी पर्यन्त आला ,पण तेथे येऊन   तो समोर बघतो तर काय ?त्याला  झोपडी शेजारून  एक माणूस पोटावर हात ठेऊन काहीसा विचित्र चेहरा करत त्याच्या दिशेने येतांना त्याला  दिसला... राजाजवळ येताच  त्याने काही एक  बोलण्यासाठी तोंड उघडले पण  त्याच्या तोंडातून पटकन रक्ताची एक मोठी गुळणी बाहेर पडली...व त्याची शुद्ध हरपली...  राजाने पटकन त्याच्या जवळ जात बघितले तर त्याच्या पोटाला मोठी जखम झालेली  होती.. राजाने साधूच्या मदतीने त्याला पटकन झोपडीत नेले ,त्याच्या  जखमे वर  साधूने   दिलेला झाडपाला जवळच्या फडक्याने करकचून बांधला आणि त्याला साधूच्या शयन मंचावर झोपवले...

या सगळ्या भानगडीत वेळ मात्र इतका गेला की,बाहेर अंधार पडला...आणि  राजा सुद्धा  सकाळ पासूनच्या  मेहनतीने आता इतका दमला  होता की त्याने सुद्धा थोडी विश्रांती घ्यायच्या उद्देशाने तेथेच ,त्या झोपडीच्या दारातच थोडी पाठ टेकवली... आणि तेथेच बघता बघता राजाला गाढ झोप लागली...

राजा जेव्हा दुसर्‍या दिवशी सकाळी उठला आणि त्याने स्वतःला जेव्हा त्या झोपडीत बघितले नि समोरचा तो जखमी माणूस जेव्हा हात जोडून त्याची क्षमा मागतोय असे त्याला जेव्हा दिसले तेव्हा  त्याचे त्यालाच आश्चर्य वाटले नि,तो त्याचा कालचा दिन क्रम आठवू लागला ...

“मला मोठ्या मनाने क्षमा करा “ तो जखमी माणूस राजाला विनंती करत होता.. राजाला लक्षात येईना .. त्याला क्षमा करायचा त्याचा संबंध काय ?... त्या वर तो जखमी माणूस पुढे सांगू लागला ... आपण मला ओळखत नाही पण मी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो ... आपण या नगरीचे राजे आहात हे मी जाणतो... मी आपल्या शेजारच्या शत्रू राज्याचा रहिवासी आहे.मात्र माझा भाऊ येथे तुमच्या राज्यात रहातो .  तुमच्या लोकांनी  त्यास खोट्या गुन्ह्या खाली  अटक करून त्याची संपत्ति जप्त केली आहे.  या गोष्टीचा  मला खूप राग आला होता ...त्यातच  काल, तुम्ही  येथे साधू महाराजांच्या कडे एकटेच येत आहात ही बातमी  मला समजली.त्यामुळे  ती संधी साधून  खरतर आपला खून करण्याच्या इराद्याने मी येथवर पोहोचलो होतो...पण वाटेत मला तुमच्या सैनिकांनी घेरले व त्यांना माझा हेतु लक्षात येताच त्यांनी मला भोसकले ... त्यांच्या तावडीतून कसाबसा मी सुटलो आणि तुम्हा पाशी इथवर कसाबसा पोहोचलो ... त्या नंतरचा इतिहास आपण जाणता ...

कृपया आपण मला क्षमा करा ... एका राज्याचा राजा असूनही माझ्या सारख्या एका अनोळखी पांथस्था सोबतचे आपले आपले कालचे वर्तन पाहून मला ही जाणीव  झाली की,मी काल फार मोठी चूक करत होतो... आपण माझ्या भावा संबंधी घेतलेला निर्णय हा योग्य असणार याची मला कालचा प्रसंग अनुभवता खात्री पटली आहे... आपण ,कृपया मला माझ्या उर्वरित आयुष्या करिता आपण मला आपल्या सेवेत  सामावून घेऊन एक प्रामाणिक सेवक म्हणून आपली सेवा करण्याची मला संधी द्यावी अशी आपल्या चरणी माझी नम्र प्रार्थना आहे. असे म्हणत त्याने राजाचे पाय धरले...

राजाने त्याची कहाणी ऐकल्यावर त्याच्या सेवकांना बोलावून घेत ,त्याच्या पुढील औषधोपचारची व्यवस्था करायला सांगत त्याची स्वतःच्या राज्यात रवानगी करायची व्यवस्था केली... एका शत्रूचे आपल्या मित्रात झालेले रूपांतर बघितल्याने राजा प्रसन्न झाला ,आणि त्या नंतर त्याने त्या साधू पुरुषाला नमस्कार करत तेथून प्रस्थान करायचे ठरवले... ...

निघतांना एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने त्या साधू पुरुषास त्याच्या त्या ३ प्रश्नांची पुन्हा एकवार उत्तरे विचारावीत असे मनाशी ठरविले... कारण ज्या साठी तो इथवर आला होता  त्याची उत्तरे त्याला अजून मिळाली नव्हती... म्हणून तो त्या साधू पुरुषा समोर येऊन उभा राहिला ...

साधू पुरुष हसला आणि म्हणाला ,राजा ,तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कालच मिळाली आहेत... तू  काल जर येथे न थांबता आल्या पावली जर तसाच निघाला असतास तर तुझ्यावर हल्ला झाला असता,पण त्या वेळी तुला माझी दया आली व  मला रोपे लावायला मदत व्हावी या हेतूने जमीन खोदाईचे काम तू येथे करत बसलास  ... जे त्या वेळी तुझ्यासाठी सर्वात महत्वाचे होते...
त्या नंतर संध्याकाळी जेव्हा तो माणूस तुझ्याकडे धावत आला, खाली पडला आणि तू त्याला जी त्या नंतर मदत केलीस ती खूप महत्वाची होती कारण ती मदत त्याला वेळेत मिळत नव्हती तर त्याचा जीव वाचणे कठीण होते.. म्हणजे तो माणूस त्यावेळी तुझ्या साठी फार महत्वाचा होता ... आणि त्याच्या साठी त्यावेळी तू जे काही केलेस ते काम तुझ्या साठी फार महत्वाचे होते..
त्या मुळे नेहमी लक्षात ठेव की,प्रत्येकवेळी  वेळ ही फार महत्वाची असते..कारण फक्त तेव्हाच तिचा उपयोग करण्याची तुम्हाला संधी असते आणि त्या-त्या  वेळी जी व्यक्ति तुमच्या सोबत असते  फक्त तीच  व्यक्ति त्या वेळी तुमच्या साठी महत्वाची असते...

जसे लियो टॉलस्टॉयच्या   “थ्री क्वेश्चन्स” या कथेचा  स्वैरानुवाद आत्ता या क्षणी तुम्ही इथे अगदी मन लाऊन वाचताय ,म्हणजे हेच काम आत्ता याक्षणी तुमच्या साठी महत्वाचे होते आणि त्याला निमित्त मी झालोय म्हणजे........     
  
धन्यवाद ::::
        


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा